एक मोठ्ठं सुख आम्हाला लहानपणी आमच्या गावात, आश्वीला अनुभवायला मिळालं आणि पुढे ते सुख आमच्यासोबत कोकणात आमचं बोट धरून दाखल झालं. आश्वीच्या ‘रानमळ्या’तल्या घराच्या अंगणातली ती टपोऱ्या जांभळाची झाडं, विहिरीशेजारची थंडगार पंचवटी, कडूसाल्या, शेंदऱ्या ही नावं आठवतायत. आजही ती चवही किंचितशी आठवते. मी सात-आठ वर्षांचा असताना आम्ही आश्वी-संगमनेरहून कोकणात देवरुखला आलो आणि नवं बालपण रुजलं.
आजोळी साखरप्याला उन्हाळ्याच्या दिवसांत हाच आनंद आम्ही भरभरून लुटला. गावाबाहेरच्या डोंगरावरच्या हापूसच्या आमराईत पडीक आंब्यासारखेच आम्हीही झाडाखाली पडून वरच्या लाल-केशरी आंब्याकडे नजरेचा नेम धरून असायचो. खूप वेळ ताटकळायला लावून तो आंबा पडायचा आणि पुढच्या मिनिटात आमच्या पोटात जाऊन बसायचा. मग करवंदं, जांभळं, काजूची बोंडं, आणि जंगलातल्या झुडुपांवर लटकणारी दुधाळ चवीची गोड तोरणं यांचा फन्ना पाडून झाला, की संध्याकाळी झाडाखालीच भेळ बनविण्याचा सोहळा साजरा व्हायचा. बागेत जातानाच सारा जामानिमा सोबत असायचा. नंतर बागेतल्या झाडाची लिंबं तोडून फर्मास ताजं सरबत व्हायचं आणि सांजवेळी आम्ही घराकडं परतायचो. बागेत चरायला सोडलेल्या गुरांची सोबत आम्हाला घरापर्यंत असायची.
मग रात्री, स्वयंपाकघरात चुलीवर उकळणाऱ्या कुळथाच्या पिठल्याचा परमळणारा वास नाकात भरून घेत हातपाय धुवून घाईने परवचा पार पडल्यावर पानावर बसायची घाई सुरू व्हायची. घरच्या तांदळाचा गरमागरम खमंग भात, कुळथाचं चवदार पिठलं, लसणाची झणझणीत चटणी आणि कवडीदार दही... अशी मेजवानी समोर आली, की दिवसभर आपण भरपेट चरलोय याचा विसर पडून ताटावर आडवा हात मारण्याचा कार्यक्रम व्हायचा.
शिवाय, घरात आम्हा भावंडांची प्रत्येकाची हापूसची खासगी अढी असायची. अंगणातल्या भाताच्या पेंढ्याच्या किंवा गवताच्या गंजीत जागा वाटून घेऊन प्रत्येक जण आपल्यापुरते चिकू पिकत ठेवायचा. पहिली अढी पिकली की पुन्हा झाडावरून नवे चिकू काढून अढीत ठेवले जायचे. थोडक्यात, पेंढ्याची गंजी - तिला तिकडे आडवी म्हणतात - हे आमचं अक्षयपात्र होतं...
सकाळी जाग यायची तीच मुळी वायनावर देठाच्या बाजूने उलट्या ठेवलेल्या फणसाच्या घमघमाटाने... मग भलाथोरला बरका फणस फोडून गरे गिळण्याच्या पैजाही लागायच्या...
... ही कौतुकं करणारी मामा-मामी आणि आजोळ होतं, म्हणून आश्वीच्या आनंदाच्या अनुभवाचं पुढचं पान उपभोगता आलं.
- दिनेश गुणे